सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवण्यासाठी वसमत येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दोन दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
संपादक:हरनामसिंग चव्हाण

सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवण्यासाठी वसमत येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराचव्हाण
वसमत (प्रतिनिधी):
देशातील प्रख्यात शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या २८ जून २०२६ पासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला आज १९ दिवस पूर्ण झाले असूनही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. या पार्श्वभूमीवर, सोनम वांगचुक यांचे उपोषण तातडीने सोडवण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन आज, १७ जुलै रोजी ‘आंतरभारती, शाखा-वसमत’ आणि ‘संवाद समूह, वसमत’ यांच्या वतीने माननीय पंतप्रधान, भारत सरकार यांच्या नावे वसमत येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात उपोषणादरम्यान मांडण्यात आलेल्या प्रमुख मुद्द्यांवर तात्काळ चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात खालील प्रमुख मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे:
परीक्षेतील गोंधळाची जबाबदारी स्वीकारावी: विविध परीक्षांमध्ये झालेल्या गंभीर गोंधळाची आणि अनियमिततेची राजकीय व नैतिक जबाबदारी शिक्षणमंत्र्यांनी स्वीकारावी.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक भरपाई: परीक्षांमधील वाढत्या तणावामुळे आणि गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य आर्थिक भरपाई देण्यात यावी.
परीक्षा पद्धतीत पारदर्शकता: भविष्यात पेपर फुटीचे प्रकार पूर्णपणे रोखण्यासाठी आणि संपूर्ण परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ठोस व कडक पावले उचलावीत.
दोन दिवसांचा अल्टिमेटम; व्यापक आंदोलनाचा इशारा
आज १९ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक हालचाल न दिसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर येत्या दोन दिवसांत या न्याय्य मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात आला नाही, तर वसमत तालुक्यात तीव्र व व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
निवेदन देतेवेळी ॲड. रामचंद्र बागल, श्रीमती संगीता देशमुख, श्रीमती रेणुका डाखोरे, श्रीमती वैशाली भकले, श्रीमती शालिनी सूर्यवंशी, श्री महादेव कापूसकरे, बाळासाहेब मलागावकर यांच्यासह आंतरभारती व संवाद समूहाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात (वसमत) अधिकृतपणे स्वीकारण्यात आले आहे.



