शहीद जवान अंकुश वाहुळकर यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त गुंज येथे आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन; रक्तदान शिबिर व वृक्षारोपण संपन्न
संपादक हरनामसिंग चव्हाण

शहीद जवान अंकुश वाहुळकर यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त गुंज येथे आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन; रक्तदान शिबिर व वृक्षारोपण संपन्न

वसमत CT NEWS
संपादक हरनामसिंग चव्हाण
वसमत: “जय जवान, जय किसान हा केवळ एक नारा नसून आपल्या देशाचा आत्मा आहे. देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणारा सैनिक आणि शेतात घाम गाळून सर्वांना अन्न पुरवणारा शेतकरी, हे दोन्ही आपल्या देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. सैनिक देशाचे रक्षण करतात म्हणून आपण सर्वजण आज सुरक्षित आणि सुखी जीवन जगत आहोत,” असे प्रतिपादन आमदार राजूभैया नवघरे यांनी केले.
वसमत तालुक्यातील गुंज येथील शहीद जवान अंकुश वाहुळकर यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त गुंज येथे भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित राहून आमदार राजूभैया नवघरे यांनी शहीद अंकुश वाहुळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
या स्मृती दिनाचे औचित्य साधून गावात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तरुणांसाठी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले, ज्याला ग्रामस्थांनी आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार राजूभैया नवघरे म्हणाले की, शहीद अंकुश वाहुळकर यांनी देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान हे अत्यंत मोलाचे असून, संपूर्ण वसमत तालुका त्यांच्या या त्यागाचे आणि शौर्याचे ऋण कधीही विसरणार नाही. त्यांचे नाव आणि पराक्रम वसमतकरांच्या मनात कायम स्मरणात राहील.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, गावकरी आणि तरुणांनी शहीद अंकुश वाहुळकर यांच्या देशसेवेच्या आणि शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी गुंज परिसरातील नागरिक, प्रतिष्ठित मंडळी आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.



