जो मैं बोलता हूँ, वो मैं करता हूँ!’; वसमतमध्ये मुस्लिम बांधवांचे ४० वर्षांचे स्वप्न पूर्ण, भव्य शादीखान्याचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते लोकार्पण
वसमत : हरनामसिंग चव्हाण
“राजकारणात वारेमाप आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणे माझ्या कामाची पद्धत नाही. जो शब्द मी देतो, तो पूर्ण करण्यासाठीच मी ओळखला जातो. गेल्या ४० वर्षांपासून वसमतमधील मुस्लिम बांधवांना केवळ आश्वासने मिळाली, पण ठोस काम झाले नव्हते. आज त्यांच्या हक्काच्या शादीखान्याचे लोकार्पण करताना मला सार्थ अभिमान वाटत आहे,” असे प्रतिपादन आमदार राजूभैया नवघरे यांनी केले.
वसमत येथील मुस्लिम समाजबांधवांची गेल्या अनेक दशकांपासून एका सुसज्ज शादीखान्याची मागणी होती. अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या, मात्र ही मागणी कागदावरच राहिली होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार राजूभैया नवघरे यांनी या कामाचा पाठपुरावा केला आणि अखेर एका प्रशस्त व सर्व सोयींयुक्त अशा शादीखान्याचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात पार पडले.
आश्वासने नाही, प्रत्यक्ष कृतीवर भर
कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार नवघरे पुढे म्हणाले की, “वसमतच्या विकासासाठी आणि सर्व समाजबांधवांच्या हितासाठी जे जे शक्य आहे, ते सर्व करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी येथे लोकांची कामे करण्यासाठी आलो आहे, कोणाची फिरवाफीरवी करण्यासाठी नव्हे. आज शादीखान्याच्या निमित्ताने समाजातील बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझ्या कामाची पोचपावती आहे.”
४० वर्षांची प्रतीक्षा संपली
गेल्या ४० वर्षांपासून केवळ कोरडी आश्वासने ऐकणाऱ्या मुस्लिम बांधवांनी या कृतीबद्दल आमदार राजूभैया नवघरे यांचे आभार मानले. “जो बोलतो, ते करून दाखवतो” या त्यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव आज संपूर्ण वसमतकरांना येत असल्याची भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
‘आपलं वसमत, आपला राजू’ या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या लोकार्पण सोहळ्याला परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.