धमकावणाऱ्यांविरुद्ध आता जन्मठेप? महाराष्ट्रातही ‘बेअदबी’विरोधात पंजाबसारखा कठोर कायदा करण्याची मागणी!
बसमत:
पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘श्री गुरु ग्रंथ साहिब’ आणि इतर सर्व पवित्र धर्मग्रंथांच्या विटंबनेविरोधात (बेअदबी) जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असलेला कडक कायदा लागू करावा, अशी आग्रही मागणी खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरनामसिंग चव्हाण* यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात मंगळवारी (२१ एप्रिल) त्यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले.
जिवंत गुरु’चा अपमान सहन करणार नाही
निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, श्री गुरु ग्रंथ साहिब जी हे शीख धर्माचे सर्वोच्च आणि ‘जिवंत गुरु’ आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून काही समाजकंटक धार्मिक सौहार्द बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक धर्मग्रंथांची विटंबना करत आहेत. अशा घटनांमुळे केवळ शीख समुदायाच्याच नव्हे, तर सर्वच श्रद्धावंतांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
हरनामसिंग चव्हाण यांच्या प्रमुख मागण्या:
जन्मठेपेची तरतूद: पंजाब विधानसभेने संमत केल्याप्रमाणे, बेअदबी करणाऱ्या गुन्हेगारांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी.
जलदगती न्यायालय: अशा गुन्ह्यांचा तपास राजपत्रित (Gazetted) अधिकाऱ्यांमार्फत करून जलदगती न्यायालयात (Fast-track Court) खटले चालवावेत.
कडक नियमावली:राज्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी सरकारने विशेष सुरक्षा नियमावली लागू करावी.
“महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नांदेडच्या श्री हजूर साहिबमुळे महाराष्ट्राचे आणि शीख धर्माचे नाते अतूट आहे. त्यामुळे सरकारने आगामी अधिवेशनात यासंदर्भात स्वतंत्र आणि कठोर कायदा करावा.”
हरनामसिंग चव्हाण
(अध्यक्ष, खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान)
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
धर्मग्रंथांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक शांतता टिकवण्यासाठी अशा कायद्याची गरज असल्याचे या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. या मागणीनंतर आता राज्य सरकार विधिमंडळात याबाबत काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण शीख समुदायाचे आणि धार्मिक संघटनांचे लक्ष लागले आहे.