काळ सरकला, पण आठवणींचा पाझर कायम; स्व. अजितदादांच्या निधनाला ५ महिने पूर्ण, आ. राजूभैय्या नवघरे भावुक
संपादक हरनामसिंग चव्हाण

काळ सरकला, पण आठवणींचा पाझर कायम; स्व. अजितदादांच्या निधनाला ५ महिने पूर्ण, आ. राजूभैय्या नवघरे भावुक
वसमत
“माणूस निघून जातो, पण त्याने जनतेच्या मनावर कोरलेलं नाव आणि कमावलेला विश्वास कधीच पुसला जात नाही. दादा आज आपल्यात नाहीत, ही पोकळी काळ बदलला तरी कधीच भरून निघणार नाही…” स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाला ५ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार राजूभैय्या नवघरे यांनी अत्यंत भावुक शब्दांत दादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
पाच महिन्यांचा काळ कसा निघून गेला हे समजलेही नाही, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दादांचे स्थान आजही तितकेच अढळ आहे. दादांची उणीव आज पावलोपावली भासत असल्याची भावना आमदार नवघरे यांनी व्यक्त केली.
…आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले
दादांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार राजूभैय्या नवघरे म्हणाले की, दादांची कार्यशैली म्हणजे राजकारणातील एक धगधगतं रसायन होतं. पहाटेच्या संथ प्रकाशात सुरू होणारा त्यांचा कामाचा धडाका, प्रशासनाला थरकाप उडवणारी त्यांची शिस्त आणि शब्दासाठी काय वाट्टेल ते करण्याची त्यांची वृत्ती ही आम्हा कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचा मुख्य स्त्रोत होती. गरिबांच्या सुखादुःखात धावून जाणारा हा ‘जनतेचा दादा’ एवढ्या लवकर आपल्याला सोडून जाईल, यावर आजही मन विश्वास ठेवायला तयार नाही.
दुःखा डोंगराएवढं, पण वारसा समाजसेवेचा!
आमदार नवघरे पुढे म्हणाले की, दादांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी रक्ताचं पाणी करून उभा केलेला कर्तृत्वाचा डोंगर आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतोय. दादा आज आपल्यात भौतिकदृष्ट्या नसले, तरी त्यांनी दाखवलेला समाजसेवेचा मार्ग आणि त्यांची तीच ऊर्जा पाठीशी ठेवून आम्ही जनतेची सेवा करत राहू. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र आणि आश्वासक स्मृतीस आमदार राजूभैय्या नवघरे आणि परिसरातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक आणि आदरांजली वाहण्यात आली.



