आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

वसमतमध्ये कचरा व अर्धवट नाली बांधकामामुळे संताप: जवाहर बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आणि त्रस्त नागरिकांचे मुख्यधिकाऱ्यांना थेट आंदोलनाचे इशारेवजा निवेदन!

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये कचरा व अर्धवट नाली बांधकामामुळे संताप: जवाहर बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आणि त्रस्त नागरिकांचे मुख्यधिकाऱ्यांना थेट आंदोलनाचे इशारेवजा निवेदन!

वसमत CT NEWS
दिनांक: १९ ऑगस्ट २०२५

वसमत: येथील कारंजा चौक ते मोंढा रोड परिसरातील जवाहर बालक मंदिर उच्च प्राथमिक शाळेपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील प्रचंड अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य आणि अर्धवट राहिलेल्या नालीच्या बांधकामामुळे शाळकरी मुले व स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येवर त्वरित कारवाई करावी, यासाठी आज जवाहर बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आणि परिसरातील त्रस्त नागरिकांनी वसमत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही समस्या तात्काळ न सुटल्यास लहान विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापकांनी दिला आहे.
शाळेच्या गेटपाशी कचऱ्याचे साम्राज्य; चिमुरड्यांचे आरोग्य धोक्यात
जवाहर बालक मंदिर ही शाळा मोंढा रोड परिसरात कार्यरत असून, या शाळेत अतिशय लहान वयाची (तीन वर्षांपासूनची) मुले शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापकांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाळेच्या अगदी बाजूलाच दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच नगर परिषदेने केलेले नालीचे बांधकाम केवळ शाळेच्या गेटजवळ आणून थांबवले आहे. पुढील बांधकाम रखडल्यामुळे आजूबाजूचे लोक व दुकानदार याच अर्धवट नालीमध्ये सर्व घाण व कचरा आणून टाकत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या साचलेल्या घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे लहान मुलांच्या प्रकृतीवर अत्यंत वाईट परिणाम होत आहे.
विजेचा खांब बनला मृत्यूचा सापळा
अस्वच्छतेसोबतच आणखी एक मोठा धोका निवेदनात अधोरेखित करण्यात आला आहे. शाळेच्या गेटजवळच विजेचा एक जुना खांब असून, त्याची अवस्था अत्यंत दुरवस्था झाली आहे. हा विजेचा खांब कधीही लहान मुलांच्या अंगावर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हॉटेल व चिकन मार्केटमुळे नागरिकांचे जगणे असह्य, धार्मिक भावना दुखावल्या
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याच मुख्य रस्त्यावर स्थानिक हॉटेल्स, बिर्याणी सेंटर्स, चिकन मार्केट आणि हातगाडी चालकांकडून उरलेले अन्न, सडलेल्या भाज्या आणि मांसाचे तुकडे सर्रास उघड्यावर टाकले जातात. या घाण कचऱ्यामुळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. हे कुत्रे रस्त्यावरील मांस आणि हाडे उचलून जवळच असलेल्या मंदिर परिसरात आणून टाकत असल्यामुळे स्थानिक भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो महिला आणि शाळकरी मुले ये-जा करतात, मात्र या दुर्गंधीमुळे नागरिकांना येथून चालणेही कठीण झाले आहे.
प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा; प्रतिलिपि रवाना
या सर्व समस्या सोडवण्यासाठी जवाहर बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांनी निवेदनाच्या शेवटी स्पष्ट इशारा दिला आहे की, “ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अन्यथा आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर (नगर परिषद) बसू.” या निवेदनाच्या प्रती योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी मा. जिल्हाधिकारी साहेब (हिंगोली) आणि मा. उपजिल्हाधिकारी साहेब (वसमत) यांच्याकडेही पाठवण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, स्थानिक रहिवाशांच्या वतीने मरिअण्णा नरसिंगअण्णा वाघमारे, रवींद्र एकनाथ सूर्यवंशी, कपिल बबनराव मगर, बबन साहेराव मगर, आणि मारोती दासराव भोसले यांच्यासह अनेक त्रस्त नागरिकांनीही स्वतंत्र स्वाक्षऱ्यांचे निवेदन देऊन संबंधित हॉटेल व चिकन मार्केट चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी (वसमत), तहसीलदार (वसमत) आणि शहर पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आल्या आहेत.
आता शाळा प्रशासन आणि त्रस्त नागरिक या दोन्ही बाजूंनी आलेल्या तीव्र निवेदनांनंतर नगर परिषद प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण वसमतकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!